Saturday, 19 April 2014

प्राच्यविद्यापंडीत कॉम्रेड शरद पाटील

प्राच्य विद्यापंडित कॉ. शरद पाटील : जाती वर्चस्ववादाच्या विरोधातील एक झंझावात
लेखक -प्रा.रणजीत परदेशी

राजकारण, इतिहास आणि संस्कृतीकरण या तिन्ही क्षेत्रात शरद पाटील यांनी दिलेले योगदान परंपरावादाच्या आणि जातीवर्चस्ववादाच्या बंदिस्त चाकोऱ्यात उध्वस्त्त करणारे राहिलेले आहे.त्यांचे कार्य पारंपरिक अभिजनवर्गाच्या हितसंबंधावर हल्लाबोल करण्यापुरते, नकारात्मक स्वरूपाचे नाही तर अब्राम्हणी छावणीतील नकारात्मक क्षेत्रात क्रांतिकारी भूवाटपाच्या लोकशाही क्रांतीचा नारा बुलंद करणारे आहे.त्याचवेळी मार्क्सवादी ते आंबेडकरवादी चळवळीतील विभूतीवाद प्रवृत्तीची चिरफड करणारे आहे.एका बाजुला पारंपरिक इतिहासातील शासक शोषक नायकांना देवत्वाच्या सिंहासनातून खाली खेचणारे आहे तर दुसऱ्या बाजूने शुद्रातिशूद्र आणि स्त्रिया यांच्यासाठी संघर्षमय राहिलेल्या सीता,शंबूक ते कबीर, शिवराय आदींना नायकत्व प्रदान करणारे राहिलेले आहे.आर्थिक,राजकीय क्षेत्रात अनेक लढायांमध्ये पराभूत झालेल्या विद्रोही चळवळींना त्यांचे न्याय्य स्थान पुर्नप्रदान करणारे आहे.अनेक ग्रंथ लिहून आणि वादळी सभा आणि झंझावाती शिबिरे महाराष्ट्रभर गाजवून कॉ.शरद पाटलांनी गेली ३-४ दशके महाराष्ट्राच्या प्रबोधन विश्वाला नवीन झळाळी दिली.नवे प्रकाशमार्ग लखलखते केले.त्यांच्या या जीवनकार्याबद्दल हे मोजके शब्द...

● जाती व्यवस्था अंताशिवाय भारतात लोकशाही क्रांती अशक्य ●
"भारतातील जातीव्यवस्था ही शोषणशासनाची पायाभूत व्यवस्था आहे.भांडवली वर्गव्यवस्थेतही ती दुय्यम स्तरावर राहुनही पिळवणुकीत महत्त्वाची भूमिका वठविते.त्यामुळे जातीव्यवस्थेचा आर्थिक पाया उखडून टाकल्याशिवाय भारतात लोकशाही क्रांती अशक्य आहे."
हे कॉँ.शरद पाटील यांचे १९७८ पासूनचे प्रतिपादन राहिलेले आहे.आपल्या या प्रतिपादनाच्या सर्मथनार्थ त्यांनी गेली ४ दशके परिश्रम केले.त्यासाठी महाराष्ट्रात कॉ.पाटील यांनी सत्यशोधक मार्क्सवादी मासिकातून महाचर्चा सुरू केली.गेल ऑमव्हेटसारख्या विदुषी कार्यकर्तीन त्यात भाव दिला.सोशल सायंटीस्टकडे लेख पाठविले.मार्क्सवाद,फुले- आंबेडकरवाद या ग्रंथातून जाती संघर्षाचा इतिहास जातीव्यवस्थेचे अर्थकारण, जातीचे समाजशास्त्र अशा विविध आघाड्यांवर वैचारिक धुमश्चक्री उभी केली. समाजक्रांतीसाठी सक्रीय संघटन बांधणार्या मार्क्सवाद्यांपुढे अनेक वैचारिक आव्हाने उभी केली. जात व वर्ग यांच्या तात्वीक आकलनापर्यंत सारख्या निबंधाद्वारे वर्गाला 'परब्रह्म' अंतिम सत्य मानणाऱ्या पोथीवादाची भंबेरी केली.१९८० पासून सुरू झालेली ही चर्चा कॉ.पाटील यांच्या निधनापर्यंत थांबलीच नाही.

वर्गवादी कम्युनिष्टांना त्यांनी आवाहन केले, "रशिया व चीनमध्ये क्रांतीचा लाल बावटा फडकाविणाऱ्या क्रांतिकारकांनो भारतात अर्थोत्पादनाचा पाया जात असल्यामुळे जातीसंघर्षाशिवाय तरणोपायच नाही." जातीच्या अकलन पारंपरिक समाजवादी, गांधीवादी आणि मार्क्सवादी प्रवाहांनी अस्पृश्य ते पुरते सीमित केल्यामुळे ते सर्व जातीच्या जाती व्यवस्था आर्थिक पायावर उभ्या आहेत. त्याचे विश्लेषण करण्यापासून दूर राहिल्या. परिणामी धनदांडगे व जात लांडगे यांचेच फावले. त्यांचे आर्थिक वर्चस्व आणि राजकीय अर्धनेतृत्व कायम राहिले.

कॉँ.शरद पाटील यांनी भारतातील विषमतेला पायाभूत असलेल्या जाती व्यवस्थेसंबंधीच्या आकडेवारी पुढे आणली. भारतात क्रांतिकारी भू वाटप झाले नाही.युरोपीयन भांडवलदार वर्गाने त्यांच्या देशातील भूमिहीनांसाठी क्रांतिकारी भूवाटपाच्या क्रांतीला जहाल सुधारणेस पाठिंबा दिला. परिणामी खरेदी शक्ती असलेल्या वर्गाचे सबलीकरण झाले. व्यापारी आणि उद्योगाला चालना मिळाली. भारतात या प्रकाराची भूक्रांती झालेली नाही. चीनमध्ये ४४ टक्के जमीन वाटली गेली. भारतात मात्र ४ टक्केदेखील भूवाटप झाले नाही. परिणामी भारतात आर्थिक क्रांतीच्या वाटाही अडविल्या गेल्या आहेत, असे प्रतिपादन कॉ.शरद पाटील करतात. (संदर्भ सत्यशोधक एल्गार, वर्ष -१ ले, अंक -१२) जातीअंतासाठी उभी केली.

जातीव्यवस्थेचा ग्रामीण भारतीय आधार जातीनुसार असलेली जमीन मालकी आहे. तिचा उच्छेद केल्याशिवाय जातीसंलग्न सामाजिक व आर्थिक विषमता नष्ट होणे अशक्यप्राय आहे हे कॉ.पाटील यांचे प्रतिपादन आहे. ग्रामीण महाराष्ट्र अथवा हरियाणा, पंजाब, यू.पी. यातील जातीय दमन झाल्याशिवाय पाठीमागे विषम भू-मालकीवर उभी जातीय रचना आहे. तिचा बीमोड झाला पाहिजे! कॉ.पाटील म्हणूनच आवाहन करतात- '...जातीअंत वर्ग आगमनाशिवाय होणार नाही, भांडवलशाही उत्पादन साधनांचा उदय झाल्याशिवाय होऊ शकणार नाही. देश आता जातीअंत क्रांतीला परिपक्व झालेला आहे. ही क्रांती वर्गक्रांतीपेक्षा जटील व कठीण आहे. (संदर्भ पूर्वोत्त)..

● जाती स्त्री-दास्यविरोधी इतिहास लेखन ●
कॉ. शरद पाटील यांनी भारतीय इतिहासाचे आकलन करताना ब्राह्मणीविरूध्द अब्राम्हणी अशा दोन विभागात वर्गवारी केली.ब्राह्मणी म्हणजे वर्णजाती स्त्री सर्मथक आणि अब्राह्मणी म्हणजे वर्णजाती स्त्री-दास्य विरोधक भारतीय समाजातील सांस्कृतिक संघर्ष ब्राह्मणीविरूध्द अब्राह्मणी छावणी यांच्या संघर्षाचा आणि संयोगाचा आहे, हे सूत्र कॉ.पाटील यांनी फुले-आंबेडकर वादाच्या प्रेरणेतून पुढे आणले. कॉ.पाटील यांनी पारंपरिक ब्राह्मणी- अब्राह्मणी वर्गवारीचे अद्यावतीकरण केले आणि भारतीय इतिहासाच्या पुनर्रचनेत महाप्रकल्पाचे महाद्वार इतिहास संशोधकांसाठी खुले केले. त्यासंदर्भातील काही महत्त्वपूर्ण निरीक्षणे पुढील प्रमाण.े.

प्राचीन भारतातील प्रारंभिक संघर्ष-
उत्पादनव्यवस्था कृषी मायेवर आधारलेली होती. त्यामुळे कृषी मायेवर नियंत्रणअसलेली मातृसत्ता स्त्रीसत्ता यावर आधारलेला समाज होता. या समाजात स्त्री ही राष्ट्रदेवी वा भूमाता म्हणून श्रेष्ठ होती.पशुपालक शेतीच्या शोधामुळे पुरूषसत्तेच्या उदयास प्रारंभ होतो. रामायणातील, महाभारतातील पायाभूत संघर्ष मावळती स्त्री-सत्ता आणि उगवती पुरूषसत्ता यांच्यातील होता. सीता, शंबूक, तारका, द्रौपदी ही विद्रोहाची प्रतिके आहेत. पुराणकथांचा वापर पितृसत्तासर्मथक मूल्यांच्या प्रसारासाठी जातीवर्चस्ववादी शक्ती करतात. या कुप्रबोधनाच्या विरोधात नवासमतावादी विद्रोही आशय कॉ.पाटील परिवर्तनवादी कार्यकर्त्यांना देतात. 'मध्ययुगीन भारतीय संघर्ष हा शासक-शोबक जाती-जमातीविरुद्ध शासित-शोषित जाती-जमाती होता' हे सूत्र कॉ.पाटील विकसित करतातआणि शिवराय आणि संभाजी यांची कुळवाडी भूषण प्रादेशिक सत्ता बुडविण्यासाठी संघर्षात असलेल्या तुर्क-मोघल आणि ब्राम्हण वतनदार श्रेष्ठी यांच्या एकजुटीवर प्रकाश टाकतात. शिवरायांना जाती स्त्रीसर्मथक फॅसिस्ट शक्तींच्या मगरमिठीतून सोडविण्याचे इतिहास प्रबोधन परिवर्तकाच्या हाती देतात. भारतीय इतिहास लेखात जातवर्चस्ववादी शक्तींच्या इतिहास लेखनाच्या राष्ट्रविरोधी कारवाया उद्ध्वस्त करारी संशोधनपद्धतीच शोधकाच्या हाती येते ! भारताच्या इतिहास लेखनासअसे क्रांतिकारी वळण गेल्या पाच दशकात केवळ शरद पाटीलच देऊ शकले!

●  साहित्यकारण : सांस्कृतिक संघर्ष ●
तथाकथित मुख्य प्रवासी साहित्य चळवळ ही सामाजिक श्रेष्ठीजनांच्या मनोरंजन आणि साहित्यिक हितसंबंधांना बांधिलकी आहे. मुख्य म्हणजे ती जातिव्यवस्थापनाच्या संदर्भातदलित, ओबीसी स्त्रिया यांचा विद्रोह लढवून टाकते, दुसर्या बाजूला, प्रकाशन, संपादन, लेखन, शिक्षण आदि बौद्धिक उत्पादन साधनांवर नियंत्रण ठेवते. या मक्तेदारीच्या विरोधात कॉ.पाटील यांनी साहित्य सभेच्या प्रस्थापनेतून विद्रोह उभा केला. दलित, आदिवासी, ग्रामीण संयुक्त साहित्य सभेची निर्मिती करण्यासाठी डॉ.रावसाहेब कसबे, कविवर्य बाबुराव बागुल, डॉ.यादवआदींच्या नेतृत्वाखाली संयुक्त सभा स्थापन झाली. साहित्य चळवळीच्या क्षेत्रातील ही अभूतपूर्व घटनाराहिलेली आहे. तिच्या प्रेरणा घेऊन पुढे विद्रोही संस्कृती चळवळी उभ्या राहिल्या. कॉ.शरद पाटील यांच्या वैचारिक लेखनाचेमूल्यमापन करतांना भारतातील दिग्गज पंडितांच्या प्रतिक्रिया बोलक्या आहेत- इरफान हबिब (सुप्रसिद्ध इतिहासकार) प्रतिपादन करतात की,आपले इतिहासलेखन वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्यातून नव्या संशोधनाला प्रेरणा मिळेल. इतिहासतज्ज्ञ रोमीला थापरही अशीच प्रतिक्रिया देतात, सौंदर्यशास्त्र विशेषांकाच्या प्रकाशन सोहळ्यात डॉ.मे.पुं.रेगे यांनी प्रशंसा केली की, कॉ.पाटील हे विद्वत्तेचे खणखणीत नाणे आहे. विचारवंत अ.भि. शहा प्रतिपादन करतात की, मार्क्सवाद जगभर कोंडीत सापडलेला आहे. कॉ.पाटील यांचे लेखन या सोडवणुकीस उपयुक्त ठरु शकेल!

कॉ.पाटील यांच्या निधनाने अब्राह्मणी विचारधारेचे प्रचंड नुकसान झाले आहे.जातीव्यवस्था अंताचे कॉ.पाटील रणांगणातले महानायक होते. आदिवासींचा वनहक्क लढा, नामांतराचा जातीविरोधी संघर्ष,मंडल आयोगाची जातीविरोधी चळवळ, आदिवासी स्त्रियांसाठी सुधारित हिंदू कुळ कायदे यात कॉ.पाटील आणि त्यांची चळवळ पुढाकारावर राहिली शेतकरी संघटनेची शेतमाल भाव चळवळ केवळ अर्थवादी राहू नये म्हणून कॉ.पाटील यांनी शेतकरी स्त्रियांच्या मेळाव्याचा उपक्रम सुचविला. जातीलढा आणि वर्गलढा यांच्या समन्वयाचा झेंडा घेऊन कॉ.पाटील आयुष्यभर लढले. त्यासाठी मार्क्सवाद-फुले, आंबेडकरवाद यांची तात्वीक मांडणीही केली. जातीव्यवस्था अंतासाठी वैचारिक शस्त्रागार उभारणारा असा नेता विचारवंत गेल्या अर्ध शतकात महाराष्ट्रात झालेला नाही.
लेखक मो. ९८८१७३0७९८
( साभार - पुण्यनगरी २० एप्रिल २०१४ चौफेर )

No comments:

Post a Comment